कोरोना काळात पुणेकरांच नेमकं चुकलं तरी कुठे..?

0

‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण प्रत्येक पुणेकरांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळते. पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. पुण्याला सांस्कृतिक वारसा लाभणार शहर अशी ख्याती आहे. पुणे सगळ्या गोष्टींमध्ये अव्वल स्थानी आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता या महामारीच्या काळात पुणं इथे सुद्धा पहिल्या क्रमांकावर आलं.

सुरुवातीला या कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यातचं आढळून आला. त्यानंतर पुण्याला या कोरोनाने आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली. एकापाठोपाठ एक रुग्ण वाढत गेले…. तरी सुद्धा पुणेकरांनी त्याला गांभीऱ्यानं घेतलं नाही. जगात परिस्थिती अगदी हाताबाहेर जात असताना त्याचा धोका आपल्या लक्षात आलं नाही. आपण त्याच वेळी जर सावध झालो असतो तर आजची ही भीषण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली नसती. नेमकं यामध्ये पुणेकर कुठे चुकतायत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय…जेंव्हा परिस्थिती हाताबाहेर जातेय हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मात्र देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी लॉकडाऊन ची घोषणा केली, पण खरंच आपण या लॉकडाऊनचं काटेकोर पद्धतीने पालन केलं का? असा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायला हवा. अत्यावश्यक सेवेसाठी एकाच घरातले २/३ लोकं हमखास बाहेर पडत होते,ते दोन तास म्हणजे त्यांच्यासाठी सुटकाच होती की काय असं वाटायला लागलं. बाहेर न पाडण्यासाठी सक्ती करण्यात आली तरी सुद्धा काही नाठाळ लोकं मुद्दाम बाहेर फिरत होती. त्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस बाहेर होतेच पण त्या पोलिसांवर सुद्धा याचा ताण आला. काहींनी तर अक्षरशः का अडवलं म्हणून पोलिसांवरच हात उचलला.. लोकांची बुध्दी हरवत चालली होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

कोरोनाचा जेंव्हा आपल्या महाराष्ट्रात आला तेंव्हा हा प्रत्येकासाठी नवीन होता. हे आव्हान पेलण्यासाठी प्रशासन आणि आपली आरोग्यव्यवस्था ही तयार नव्हती, पण जेंव्हा मात्र या कोरोनाने आपला उद्रेक करायला सुरुवात केली तेंव्हा मात्र आपली आरोग्य व्यवस्था सज्ज झाली. कोरोनाचं संक्रमण जेवढ्या ताकदीनं वाढत होतं तेवढ्या वेगानं प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था काम करताना मात्र दिसली नाही. त्यामुळं रुग्णांची वाढत असलेली संख्या आणि प्रशासनाची उडालेली धांदल पाहायला मिळाली. आता या सगळ्यांबरोबर च आरोग्य विभागामध्ये कमतरता जाणवू लागल्या.मग त्यामध्ये डॉक्टरांची संख्या, परिचारिकांची संख्या, औषधांचा असलेला तुटवडा,आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे व्हेंटिलेटरचा कारण व्हेंटिलेटरची संख्या आपल्याकडे कमी होती. त्याचबरोबर आवश्यक असणाऱ्या बेडची संख्या, अँब्युलन्स न मिळणे या गोष्टींची कमतरता आपल्याकडे होती.

जेव्हा या गोष्टींची उणीव भासू लागली तेव्हा प्रशासनाने आदेश दिले की खासगी रुग्णालये सुद्धा या कोरोना रुग्णांसाठी खुले करण्यात यावीत. कारण याआधी खासगी रुग्णालये या कोरोनाच्या भीतीमुळे बंद करण्यात आली होती आणि साहजिकच याचा ताण हा सरकारी रुग्णालयांवर आला. जर खासगी रुग्णालयांनी त्याचवेळी आखडता हात घेतला नसता तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये रुग्णालयांवर आलेला ताण हा वाढला नसता. रुग्णांसाठी लागणारा ऑक्सीजन सिलेंडर ची कमतरता भासू लागली. त्यामुळे आता प्रत्येक राज्य आपापल्या परीने या कोरोनावर नियंत्रण ठेण्याकरिता प्रयत्न करतंय.

आता यामध्ये पुणेकरांच नेमकं चुकलं कुठे? तर प्रशासन आपल्याला वारंवार सूचना देत असताना आपण त्याचं किती प्रमाणात पालन केलं आणि आत्ताच्या काळात सुद्धा करतोय का ? हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायला हवा. सुरक्षित अंतर ठेवा,मास्क लावा, वारंवार हात धुवा या सगळ्या गोष्टी आपण खरंच करत आहोत का? पुण्यात हेल्मेट घालत नाहीत पण आता या कोरोनाच्या काळात किमान मास्क तरी घाला… अनलॉक च्या टप्प्यात तर लोकांनी कहरच केला.. दुचाकी वर एकालाच परवानगी असताना डबल, ट्रीपल सीट लोकं फिरत होते…नाही म्हणजे आत्तापर्यंत पुण्यात माणसांचे अपमान होतात हे ऐकल होतं पण या कोरोना सारख्या विषाणूंचा ही इतका वाईट अपमान होईल असं वाटलं नव्हतं. लोकं याला गांभीर्याने घेतच नाहीत..आपल्याला या कोरोनाला आणखी बळकट होऊ न देता वेळीचं कायमचा ब्रेक लावायचा आहे. त्यामुळे शहाणे व्हा आणि काळजी घ्या….

-सिद्धेश ताकवले

 

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.