निसर्ग भटक्यासाठी सदैव आकर्षण ठरणारा भाग म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेन हा भाग समृद्ध आहे. पण या सगळ्या बरोबरच रतनवाडीच अमृतेश्वराच मंदिरही भटक्यांची पावलं जखडून ठेवतात. हेमाडपंथी स्थापत्यशैलीच हे मंदिर आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यापासून 50 किलोमीटर अंतरावर रतनवाडी हे गाव वसलेल आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण, रंधा धबधबा ही स्थळ आपल्या सगळ्यांच्या परिचयाची झाली आहेत. पण, या भागाच खरं सौंदर्य हे या धरणाच्या पलीकडच्या भागात आहे. घाटमाथ्यालगतच्या या भागात उंच डोंगररांगांनी एक वेगळाच खेळ मांडला आहे. या खेळात उंच पर्वत, कोकणात कोसळणारे खोल कडे, अनेक घाटवाटा, रतन, अलंग-कुलंग सारखे गड, सर्वोच्च स्थानी विसावलेली ती कळसुबाई या सगळ्यांवर पसरलेली दाट वनसंपदा, जीवसृष्टी, छोटी-छोटी आदिवासी खेडी, त्यांची संस्कृती आणि या सगळ्यावर लक्ष ठेवून मधोमध विसावलेला तो रतनवाडीचा अमृतेश्वर !!!
खरंतर, हाच भाग हिंडण्या-फिरण्याचा, निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा, इथला इतिहास जागवणारा. निळ्या जलाशयाच्या पार्श्वभूमीवर काठावरचा अमृतेश्वर, मागची छोटीशी रतनवाडी, त्यामागचा रतनगड हे सगळ निसर्ग चित्र पाहणाऱ्याला गुंतवून टाकत. यातून त्या अमृतेश्वराबद्दलची उत्कंठा वाढते. आणि या धुंदीतच त्या कोरीव वास्तू प्रकाराला आपण सामोरे जातो. जलाशयाच्या काठावर एखाद्या गायीने पाय दुमडून बसाव तस हे मंदिर दूरवरूनच दिसत. जवळ जाऊ तस त्याच कोरीव देखनेपण, सुडोल रचना मन खेचून घेत. हेमाडपंथी स्थापत्यशैलीच हे मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिराच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने प्रवेशद्वार आहेत. आतमध्ये जाताच इथलं कोरीवकाम मनाचा ताबा घेत. नक्षीदार खांब, बाह्य भिंतीवर विविध भमितिक रचना, आतल्या भिंतीवरच मूर्तीकाम हे सगळंच विलक्षण !!! या सगळ्यावर यक्ष, अप्सरा, गंधर्व स्वार झालेत. यातला तो समुद्रमंथनाचा देखावा तर पाहण्यासारखा आहे आतील स्तंभ भरजरी आहेत. गर्भगृहाच्या दारी कीर्तीमुख, शंख, कमळवेलीच्या पायघड्या घातल्या आहेत. या मंदिराच शिखरही तेवढंच कोरीव, श्रीमंत !!!
या राईत एखाद रानफुल उमलाव तस हे मंदिर भासत. मंदिरातुन थोडं पुढ गेलो कि जमिनीलगत साकारलेली एक जलवास्तू तिच्या सौंदर्यात बुडवून टाकते. पुष्करणी ! नावाप्रमाणच सुंदर !!!देवांचा सहवास लाभलेली ही जलवास्तूची निर्मिती. या पुष्करणीं निर्मितीही या अमृतेश्वराच्या रहालात झालेली आहे. ही पुष्करणी तब्बल 20 फूट लांब आणि रुंद. जमिनीलगत कोरीव, आखिव – रेखीव अशी तिची रचना. एका बाजूनं आत उतरण्यासाठी पायऱ्या, आत फिरण्यासाठी धक्के, भोवतीच्या भिंतीत बारा देवकोष्टांची रचना. त्यांच्या डोईवर छोट्या छोट्या कोरीव शिखरांची रचना. गणेशाची मूर्ती आणि विष्णूचे अवतार विसावलेले. आणि याला नितळ पाण्याची साथ !!! या पुष्करणीला लोक विष्णूतीर्थ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा सांगितली जाते.
खरंच, कोणत्याही स्थापत्याला निसर्गाच कोंदन मिळालं की ते अजून खुलत.इ. स.9व्या शतकात शीलहारा घराण्यातील शासकांनी हे सुंदर दगडी मंदिर बांधलं. बारा शिव मंदिरापैकी एक असं हे मंदिर आहे. पूर्वज्यांच्या या कलासक्तीच कधी – कधी खूप कौतुक वाटत. हे मंदिर बघण्यासाठी अनेक पर्यटक इथं येत असतात.
– कोमल पाटील
हे पण वाचा
#प्राचीन_महाराष्ट्र : शिखरापासून पायापर्यंत बांधलेल्या कैलास मंदिराची कथा तुम्हाला माहितीये का ?