मुंबई… स्वप्नांची नगरी म्हणजे मुंबई… स्वतः ला सिध्द करण्यासाठी, आपल्या करीयरच्या वाटा शोधण्यासाठी अनेक तरुण तरुणी मुंबईचा रस्ता धरतात. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं. आज आपण मुंबईचा इतिहास , मुंबई कशी निर्माण झाली हे जाणून घेऊयात…
मुंबईची संस्कृती इतकी जुनी आहे की आपण विचारही करू शकत नाही. मुंबईच्या अस्तित्वाचा पुरावा दुसऱ्या शतकातही सापडतो, जेव्हा मौर्य साम्राज्यात याच बेटांवर हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक वसले असल्याचं इतिहासात सांगितले जाते.
मुंबईची कहाणी खूपच रंजक आहे कारण ती शतकानुशतके बदलत आली आहे. आणि प्रत्येक शतकात हे शहर भारतासाठी खूप महत्वाचे ठरले आहे सर्वात मोठा बदल पोर्तुगीजांच्या आगमनानंतर झाला.आजची जी मुंबई आपण बघतोय तशी मुंबई आधी नव्हती. त्यावेळी मुंबई ही सात वेगवेगळ्या बेटांमध्ये वसलेली होती.
काही वर्षांपूर्वी कांदिवली येथे काही प्राचीन अवशेष आढळून आले. यावरून असं लक्षात येतं की हे द्वीप समूह पाषाण युगापासून अस्तित्वात आहे. इथे मानवलिखित पुरावे हे २३०० वर्षांपूर्वीचे सापडले तेंव्हा मुंबईला हेप्टानेशिया असं म्हटलं जात होतं. मग हा द्वीपसमूह तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्याचा भाग बनला.
या शतकात सम्राट अशोकाच मुंबईच्या बेटांवर शासन होतं, परंतु काही सुरुवातीच्या काळात मुंबईचं नियंत्रण हे सातवाहनांकडे होतं व नंतर हिंदू सीलहरा वंशांच्या राजांनी इथं १३४३ पर्यंत राज्य केलं. त्यानंतर गुजरातचा राजा बहादुरशाहाने इथे वर्चस्व प्रस्थापित केलं, आणि त्यानंतर युरोपीय लोकांचं आगमन भारतात झालं.त्यामध्ये सगळ्यात आधी पोर्तुगिजांनी बहादूरशहा कडून ही बेटं हिरावून घेतली. इ. स १५३४ मध्ये पोर्तगिजांनी मुस्लिम शासक हुमायून आणि बहादुरशाहा सोबत(Treaty of Bassein) बेसिन चा तह केला. जो डिसेंबर १५३४ मध्ये झाला. याचा अर्थ असा की मुंबईची ७ बेटे जी बेसिन शहरालगत होती (आता या बेसिन ला वसई असे म्हणतात जो मुंबईचाच एक भाग आहे.) पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली येतील. मुंबई स्थापनेची ही सुरुवात होती.
पोर्तुगीजांच्या आगमनानंतर काय झाले? हे नाव मुंबईला कसे देण्यात आले? हे आपण जाणून घेऊया.
१५३४ मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईची बेटे ताब्यात घेतली. तोपर्यंत ते शहर बनले नव्हते तर बर्याच बेटांचे समूह बनले होते. पोर्तुगीजांना या शहरात व्यापार केंद्र किंवा कारखाना बांधायचा होता. पोर्तुगीज लोक या शहराला बोम बाहिया असे म्हणत ज्याचा अर्थ ‘गुड बे’ होता. ब्रिटिशांनी बॉम्बेची पुनरावृत्ती करून हाच शब्द बोलण्यास सुरवात केली आणि अशा प्रकारे बेटांच्या गटाला त्यांचे सर्वात लोकप्रिय नाव बॉम्बे मिळाले.१६२६ पर्यंत, १०० वर्षांपेक्षा कमी कालावधीत,या बेटांचे रूपांतर एका मोठ्या शहरात झाले. इथून बर्याच वस्तूंची निर्यात केली गेली आणि हे असे शहर बनले की जेथे सामान्य लोकांसाठी मोठ्या वाड्यांपासून पक्की घरे अशी प्रत्येक गोष्ट होती. जहाज तयार करण्यासाठी यार्ड देखील बांधले गेले होते. गोडाऊन, गड, मठ इ. सगळ्या गोष्टी तिथे होत्या.
मुंबईची जी सात बेटं होती त्यांच्या विषयी सुद्धा आपण जाणून घेऊयात.
१) पहिलं बेट म्हणजे कुलाबा बेट
कुलाबा हा शब्द कोळीभाषेतील कोळभात ह्यावरून आलेला आहे.हे कोळी पोर्तुगीज येण्याआधीपासूनच येथे राहत असलेले मूळ रहिवासी आहेत. आता असलेले कुलाबा पूर्वी दोन विभागांत विभागलेले होते. ते म्हणजे कुलाबा आणि धाकटा/छोटा कुलाबा. कुलाबा हे मुंबईच्या सात बेटांपैकी एक बेत असून ज्यावर पोर्तुगीजांनी राज्य केलेले आहे.
२) दुसरं बेट म्हणजे छोटा कुलाबा (Little Colaba/म्हातारीचे बेट – Old Woman’s Island )
हा सगळ्यात छोटा भाग होता म्हणून याला छोटा कुलाबा असं म्हटलं जातं. याला आधी अल ओमानी असं सुद्धा म्हटलं जात होते. कारण तिथले कोळी बांधव हे मासेमारी करण्यासाठी ओमान देशापर्यंत जात असत. हे सुद्धा मुंबईच्या सात बेटांपैकी एक बेट आहे.
३) तिसरं बेट म्हणजे मुंबई बेट.
ब्रिटिशांच्या काळात या बेटाला मध्यवर्ती बंदर म्हणून मान्यता होती . सध्याचा डोंगरी ते मलबार हिलचा भाग म्हणजे हे बेट होय . मौर्यांच्या काळात हे बेट पश्चिम भारतात बुद्ध धर्माचं शिक्षण देण्याचं महत्वाचं ठिकाण होतं . या ठिकाणची संपन्नता आणि समुद्र किनारा बघून जगातल्या काही महासत्ता या बेटाकडे आकर्षित झाल्या . ब्रिटिशांच्या आधी या बेटावर दिल्ली , गुजरात आणि बहामनी या साम्राज्यांनी राज्य केलं .
४) चौथ बेट म्हणजे माजगाव
आजच्या काळातला दक्षिण मुंबईचा भाग हा माजगावचीच देण आहे असं म्हटलं तरी चालेल. माजगाव बेटाला मासेमारी करणाऱ्यांच गाव म्हणून ओळखलं जायचं . १७ व्या शतकानंतर माजगाव मुंबई शहरा चा चेहरा तयार झाला होता. म्हणजे आजपासून ३०० वर्षांपूर्वीच मुंबईने जन्म घेतला होता.
५) पाचव बेट म्हणजे वरळी
वरळी इथ आत्ताच्या काळात हजी अली दर्गा आहे. हे बेट त्याकाळी शहराच्या राजधानीला जोडणारी एक रेष होती.
६) सहाव बेट म्हणजे परळ
परळ मुंबईच्या मूळ सात बेटांपैकी एक होते. हा प्रदेश १३ व्या शतकात राजा भिमदेवाच्या आधिपत्यात होता. ही बेटे पोर्तुगिजांच्या हातात आल्यावर त्यांनी परेळ बेट जेसुईट धर्मगुरुंना दिला. १६८९मध्ये झालेल्या ब्रिटिश व सिद्धी यांच्या लढाईत जेसुइटांनी सिद्द्यांची बाजू घेतली. लढाईत ब्रिटिशांचा विजय झाल्यावर त्यांनी परळ जेसुइटांकडून काढून घेतले.
७) सातव बेट म्हणजे माहीम
मुंबई शहर ज्या सात बेटांनी बनलेले आहे, त्यापैकी एक म्हणजे माहीम. जुने माहीम किंवा महिकावती ही राजा भिमादेवाची राजधानी होती. त्याने तेराव्या शतकात ह्या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि एक राजवाडा बांधला. प्रभादेवी येथील एका न्यायालयाचे आणि बाबुलनाथ देवळाचेही बांधकाम त्याच्या कारकिर्दीत झाले. हे जुने माहीम उर्फ केळवा माहीम उर्फ के. माहीम उर्फ महिकावती शहर मुंबईपासून ६० किलोमीटरवर पालघर जवळ आहे. महिकावती देवीचे प्राचीन मंदिर अजूनही तेथे आहे. रामाला आणि लक्ष्मणाला अभिरावण आणि महिरावण या दोघांनी ह्या देवळात बंदी केले होते असा उल्लेख रामायणात आहे, असे म्हणतात.हनुमानाने त्यांची येथून सुटका केली होती. जेव्हा राजा भिमादेव युद्धात पराजित झाला तेव्हा त्याने मुंबई जवळ आपली नवीन राजधानी बनवून तिचेसुद्धा नाव माहीम ठेवले, असे जुन्या माहीमकरांचे म्हणणे आहे.
हुंड्यात दिली होती मुंबई…
ब्रिटिशांना बाहेरून मुंबई ताब्यात घेता आली नाही. ब्रिटिशांचे लक्ष मुंबईकडे फार पूर्वीपासून होते, परंतु ते कोणत्याही परिस्थितीत ते घेऊ शकले नाहीत, परंतु १५५२ मध्ये ब्रिटिश पंचांच्या सुरत कौन्सिलने ब्रिटीशांना पोर्तुगालहून बॉम्बे खरेदी करण्यास सांगितले. त्या काळात बरेच काही घडले, परंतु ९ वर्षांच्या आतच, ब्रिटनच्या चार्ल्स (दुसरा) ने पोर्तुगालच्या राजाची मुलगी कॅथरिनशी लग्न केले त्याचवेळी ११ मे १६६१ रोजी मुंबईची ७ बेटे हुंडा म्हणून ब्रिटनला देण्यात आली.
परंतु चार्ल्स या शहरावर फार काळ राज्य करू शकला नाही. त्याला वाद टाळण्याची इच्छा होती आणि त्यानंतर चार्ल्सने मुंबई ही ईस्ट इंडिया कंपनीला वर्षाला फक्त 10 पौंड सोन्यावर भाड्याने दिले. आणि अशी ईस्ट इंडिया कंपनी मुंबईत आली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांसाठी ही जागा अनुकूल नव्हती. बर्याच युरोपीय लोकांचा असा विश्वास होता की या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे मृत्यू तीन वर्षांत होईल. तिथे दोन पावसाळे पाहिल्यानंतर लोकांना तिसरा दिसला नाही. जन्मलेल्या मुलांपैकी, २० पैकी केवळ १च जगू शकले आणि तेथे राहणाऱ्या पुरुषांना स्थानिक महिलांशी लग्न करण्यास सांगितले गेले. हळू हळू इस्ट इंडिया कंपनी च्या लोकांनी आपले बस्तान बसवले.त्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या सोयीनुसार मुंबई वसवायला सुरुवात केली…..
To be continued….
-सिद्धेश ताकवले